पाहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर नवापूरमध्ये निषेध: पाकिस्तानचा झेंडा जाळत केंद्र सरकारवरही ताशेरे.
जम्मू आणि काश्मीरमधील पाहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत आज शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे नवापूरमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले. या घटनेत २७ हून अधिक निष्पाप पर्यटकांचा बळी गेला असून अनेक जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना निवेदन देण्यात आले.दुपारी ३ वाजता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शिवसैनिक एकत्र जमले. पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत बसस्थानकासमोर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळण्यात आला. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत ध्वज ताब्यात घेतला.यानंतर शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करत तहसील कार्यालयात धडक दिली व तहसीलदारांना निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, "हा हल्ला माणुसकीला काळिमा फासणारा आहे. पाहलगामसारख्या संवेदनशील भागात पोलिस किंवा जवान उपस्थित नसणे हे केंद्र सरकारच्या कुचकामी धोरणाचे उदाहरण आहे. जर योग्य सुरक्षा व्यवस्था असती, तर हा नरसंहार टाळता आला असता."निवेदनात शिवसेनेने केवळ पाक पुरस्कृत दहशतवाद्यांचा नव्हे, तर केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाचाही निषेध केला आहे.निवेदन देतेवेळी जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील, तालुका प्रमुख कल्पित नाईक, शहर प्रमुख अनिल वारुडे, जिल्हा उपसंघटक मनोज बोरसे, तालुका संघटक देवका पाडवी युवासेना जिल्हा उपप्रमुख दिनेश भोई,प्रविन ब्रम्हे, किसन शिरसाठ,प्रमोद वाघ, महेंद्र गावित, फिरोज शेख, मुसा काकर, सचिन चौधरी, पवन पाटील, दिनेश खैरनार, मनोहर चौधरी आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते