नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात होणारा सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित होईल, असे नियोजन करावे. भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत रस्ते, साधूग्रामच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने सुरू करीत कामांना गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
कुंभमेळ्यासाठीच्या कामांना प्राधान्य देण्यात येईल. त्यानुसार देशभरातून होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहतुकीचे नियोजन करताना रस्त्यांचा आवश्यक तेथे विस्तार करावा. गोदावरी नदी पात्रात स्वच्छता राहील याची दक्षता घेताना जल प्रदूषण टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. मल:निस्सारण, जलशुद्धीकरणाचे प्रस्ताव तातडीने राज्य शासनाला सादर करावेत. त्यासाठी आवश्यक निधीच्या तरतुदीसाठी प्रयत्न केले जातील. कुंभमेळा कालावधीत होणारी भाविकांची गर्दी पाहता सीसीटीव्ही, ध्वनिक्षेपक यंत्रणेचे बळकटीकरण करावे. त्यासाठी नाशिक शहर व ग्रामीण पोलिसांनी समन्वयाने नियोजन करावे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज सायंकाळी नाशिक महानगरपालिका, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, कुंभमेळा व अन्य अनुषंगिक विषयांबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, आमदार किशोर दराडे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सुहास कांदे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्रीनाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. माणिकराव गुरसळ, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, माजी खासदार हेमंत गोडसे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.