नवापूर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील समस्याबाबत सामाजिक कार्यकर्त्यानी उपोषणाचा दिलेला इशारा--मध्यस्थीने उपोषण टळले
@ प्रलंबित समस्यांचे तातडीने आणि सकारात्मक दिशेने निराकरण करण्याचे प्रशासनाकडून ठोस आश्वासन-उपोषण तूर्त मागे..!!
नवापूर प्रतिनिधी
नवापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते उमेश पवार,भिमसेनिक व भिमअनुयायी यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने उमेश बापू पवार यांनी आज, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून नवापूर तहसील कार्यालयाजवळ बेमुदत धरणे उपोषणाचा निर्धार केला होता.
यापूर्वीही या गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उमेश पवार यांनी नगरपालिकेसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते. मात्र, प्रशासनाकडून त्याची दखल न घेतल्याने परिस्थिती जैसे थे राहिली. यामुळे त्रस्त झालेल्या उमेश पवार यांनी अखेर बेमुदत उपोषणाचे शस्त्र उगारले.
आज सकाळी तहसील कार्यालयासमोर उमेश पवार उपोषणाला बसताच प्रशासनाची धावपळ झाली. अखेरीस, तहसीलदार दत्तात्रय जाधव,मुख्यधिकारी डॉ मयुर पाटील, माजी नगराध्यक्ष गिरीश गावित आणि माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मध्यस्थीचा प्रयत्न केला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील प्रलंबित समस्यांचे तातडीने आणि सकारात्मक दिशेने निराकरण करण्याचे ठोस आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.
प्रशासनाकडून मिळालेल्या आश्वासनानंतर सामाजिक कार्यकर्ते उमेश पवार यांनी आपले नियोजित बेमुदत धरणे उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. मात्र, प्रशासनाने दिलेल्या वेळेत समस्यांची सोडवणूक न केल्यास पुन्हा आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आता प्रशासनाकडून या आश्वासनाची पूर्तता कधी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.उपोषन स्थळी सामाजिक कार्यकर्ते उमेश पवार, कृणाल नरभवर ,गोरख नगराळे,अजय चव्हाण,रोहन पवार,टेपन वसावे,संजय सोनवणे आदी उपस्थित होते. उपोषणाकडे नवापूरकरांचे लक्ष लागून होते. सतत पाठपुरावा केला तर आपण यशस्वी होतो हे उमेश पवार, भीमसैनिक व अनुयायी यांनी दाखवून दिले